प्रा. संजय भेंडे यांना उमेदवारी, तिवारी यांच्यावर ‘दया’ नाहीच!

नागपूर : विधान परिषद निवडणुकीसाठी नागपुरातून भाजपचे ज्येष्ठ नेते प्रा. संजय भेंडे यांना पक्षाने उमेदवारी जाहीर केली. भाजपच्या केंद्रीय निवडणूक समितीने मंगळवारी रात्री पक्षाच्या पाच उमेदवारांच्या नावाची घोषणा केली. शहर भाजप अध्यक्ष दयाशंकर तिवारी यांची पुन्हा पक्षाने निराशा केली. तिवारी यांना विधानसभेत तयारी केली होती. त्यावेळीही त्यांना उमेदवारी मिळाली नाही.
येत्या १३ मे रोजी विधान परिषदेच्या ९ सदस्यांचा कार्यकाळ संपत आहे. नागपुरातील संदीप जोशी यांचाही यात समावेश आहे. संदीप जोशी यांच्या जागेवर प्रा. भेंडे, तिवारी, उपेंद्र कोठेकर, डॉ. राजीव पोतदार यांच्या नावाची चर्चा होती. मंगळवारी भाजपच्या केंद्रीय निवडणूक समितीने प्रा. संजय भेंडे यांचे नाव जाहीर करीत इतरांना धक्का दिला.
नागपुरातील संजय भेंडे भाजपचे वरिष्ठ व प्रामाणिक नेते आहे. लहानपणापासून ते राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी जुळलेले असून नागपुरातील न्यू इंग्लिश कनिष्ठ महाविद्यालयात प्राध्यापक होते. त्यांनी शहर भाजप, प्रदेश भाजपमध्ये विविध पदाची जबाबदारी लिलया पार पाडली. त्यांचे सहकार क्षेत्रातही मोठे योगदान आहे. नागपूर नागरिक सहकारी बँकेचे अध्यक्षही आहेत. विविध सामाजिक संस्थांसोबतही त्यांचा संबंध आहे. पक्षाच्या पडत्या काळात त्यांनी संघटन बांधणीची कामे केली. त्यांना संधी मिळावी, अशी अपेक्षा पक्षातील काही नेते व्यक्त करीत होते.
दरम्यान, नागपुरातून माजी महापौर दयाशंकर तिवारी, प्रा. संजय भेंडे, डॉ. राजीव पोतदार, उपेंद्र कोठेकर यांच्याशिवाय ऐनवेळी भाजप धक्कातंत्राचा वापर करीत अनुसूचित जातीतून उमेदवार देण्याची शक्यताही व्यक्त केली जात होती. परंतु आज प्रा. भेंडे यांना पक्षाने संधी दिली. त्यामुळे त्यांना न्याय मिळाल्याची भावना भाजपमधील त्यांचे हितचिंतक व्यक्त करीत आहे. भाजपने लोकसभा आणि विधानसभा निवडणूकीत पराभूत झालेल्यांना विधानपरिषदेवर संधी द्यायची नाही, असे धोरण स्वीकारले होते. विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी संघटनेत काम करणाऱ्या आणि नव्या चेहऱ्यांना संधी देण्याचा महाराष्ट्र भाजपच्या कोअर कमिटीच्या बैठकीत निर्णय घेण्यात आला होता. त्यानुसार महाराष्ट्र भाजपकडून केंद्रीय नेतृत्वाला ३० जणांची यादी पाठवण्यात आली होती. यात नागपुरातील डॉ. उपेंद्र कोठेकर, दयाशंकर तिवारी, संजय भेंडे, संदीप जोशी यांच्या नावाचा समावेश आहे. याशिवाय माधवी नाईक, मनोज कोटक, केशव उपाध्ये, रवी अनासपुरे, राजेश पांडे, राम सातपुते, रणजितसिंह निंबाळकर, संजय काका पाटील, विवेक कोल्हे, जगदीश मुळीक, प्रमोद जठार, संजय केणेकर, अर्चना पाटील चाकूरकर, दादाराव केचे अशी नावे यादीत होती. आज प्रा. संजय भेंडे यांच्यासह माधवी नाईक, प्रमोद जठार, विवेक कोल्हे, सुनील कर्जतकर यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आले.
Advertisement




