नागपुरात झोपडपट्ट्यांवर बुलडोझर, पण पुनर्वसन शून्य; आमदार विकास ठाकरे विधानसभेत संतापले
नागपूर -नागपुरातील झोपडपट्टी हटवून हजारो नागरिकांना अक्षरशः रस्त्यावर आणल्याचा गंभीर आरोप करत आमदार विकास ठाकरे यांनी आज विधानसभेत सरकार आणि प्रशासनावर जोरदार हल्लाबोल केला. झिंगाबाई टाकळी, मानकापूर परिसरातील संत ज्ञानेश्वर नगर आणि राजानगर येथील झोपडपट्ट्या हटवल्यानंतरही एकाही कुटुंबाचे पुनर्वसन न झाल्याची बाब त्यांनी ठळकपणे मांडली.
“उन्हाच्या तडाख्यात महिला, लहान मुले आणि ज्येष्ठ नागरिक उघड्यावर जगत आहेत. ही केवळ निष्काळजीपणा नाही, तर प्रशासनाची अमानुषता आहे,” अशा शब्दांत त्यांनी संताप व्यक्त केला.
सर्वोच्च न्यायालयाच्या स्पष्ट निर्देशांकडे दुर्लक्ष करून कारवाई करण्यात आल्याचा आरोप करत, तात्काळ सर्व विस्थापितांना कायमस्वरूपी घर देण्याची मागणी त्यांनी केली.
तसेच, काचीपुरा आणि रामदासपेठ येथील PDKVच्या जमिनीवर वर्षानुवर्षे राहत असलेल्या नागरिकांना मालकी हक्काचे पट्टे देण्याचीही त्यांनी जोरदार मागणी केली.घर ही नागरिकांची मूलभूत गरज आहे. विकासाच्या नावाखाली लोकांना बेघर करणे कोणत्याही परिस्थितीत सहन केले जाणार नाही,असा इशारा देत ठाकरे यांनी सरकारला धारेवर धरले.
Advertisement
