‘रोज रामरक्षा पठण करा’, उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्र्यांचा सल्ला; रामरक्षा आंदोलनावरून राजकीय शाब्दिक चकमक
Advertisement

चंद्रपूर : राम मंदिरातील कथित देणगी गैरव्यवहाराच्या निषेधार्थ शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाने जाहीर केलेल्या ‘रामरक्षा आंदोलनावर’ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी टीका करत उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे. चंद्रपुरात प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना फडणवीस म्हणाले की, “उद्धव ठाकरे यांना अखेर प्रभू श्रीरामांची आठवण झाली, ही आनंदाची बाब आहे.”
मुख्यमंत्री पुढे म्हणाले, “ज्यांनी श्रीरामांचा मार्ग सोडला, त्यांच्या पक्षाची आजची अवस्था सर्वांसमोर आहे. आता जर त्यांनी पुन्हा श्रीरामांचा आदर्श स्वीकारला, तर त्यांच्यासाठी ते निश्चितच हिताचे ठरेल.” यावेळी त्यांनी उद्धव ठाकरे यांनी केवळ आंदोलनापुरते नव्हे, तर दररोज ‘रामरक्षा स्तोत्र’चे पठण करावे, असा टोला लगावला.
दरम्यान, अयोध्येतील राम मंदिराच्या देणगीपेटीतील कथित आर्थिक गैरव्यवहाराच्या आरोपांवरून उद्धव ठाकरे यांनी ‘रामरक्षा आंदोलन’ची घोषणा केली आहे. या आंदोलनात मारुती मंदिरात एकत्र येऊन रामरक्षा स्तोत्र, हनुमान स्तोत्र आणि हनुमान चालीसाचे सामूहिक पठण करण्यात येणार असल्याचे त्यांनी जाहीर केले आहे.
उद्धव ठाकरे यांनी या प्रकरणावरून भाजप आणि मंदिर प्रशासनावर टीका करत दोषींवर कारवाईची मागणी केली आहे. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री फडणवीस यांच्या वक्तव्यामुळे राज्यातील राजकीय वातावरण पुन्हा तापण्याची चिन्हे दिसत आहेत.



