मोठ्या घरातील माताही दारू पितात…; धीरेंद्र शास्त्रींच्या वक्तव्याने नागपुरात वादंग, काँग्रेस आक्रमक


नागपूर : धार्मिक व्यासपीठावरून केलेल्या एका वक्तव्यामुळे बागेश्वर धामचे कथावाचक धीरेंद्र कृष्ण शास्त्री पुन्हा एकदा वादाच्या केंद्रस्थानी आले आहेत. महिलांविषयी केलेल्या त्यांच्या टिप्पणीने सामाजिक आणि राजकीय वर्तुळात तीव्र प्रतिक्रिया उमटत असून, नागपुरातील हा मुद्दा आता राज्यभर चर्चेचा विषय ठरत आहे.
कथेदरम्यान शास्त्री यांनी “आजकाल मोठ्या घरातील माताही दारू पित आहेत… बजरंगबली वाचवा,” असे वक्तव्य करत समाजातील बदलत्या प्रवृत्तीवर भाष्य केले. पुढे बोलताना त्यांनी अशा सवयींचा मुलांच्या संगोपनावर गंभीर परिणाम होऊ शकतो, अशी चिंता व्यक्त केली. “उद्या बाळ रडल्यावर त्यालाही दारू देऊन शांत केले जाईल,” असा उल्लेख करत त्यांनी परिस्थितीचे अतिशयोक्त चित्र रंगवले.
राजकीय पडसाद; काँग्रेसचा निषेध-
या वक्तव्याचे पडसाद लगेचच राजकारणात उमटले. भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या महिला आघाडीने आक्रमक भूमिका घेत, शास्त्री यांच्या वक्तव्याचा तीव्र निषेध नोंदवला. महिला काँग्रेसच्या नेत्या दीप्ती पांडे यांनी धार्मिक मंचावरून महिलांविषयी अशा प्रकारची विधाने करणे अस्वीकार्य असल्याचे स्पष्ट केले.
“आई ही मुलांची पहिली गुरू असते. अशा जबाबदार स्थानावरून महिलांचा अवमान करणारी वक्तव्ये सहन केली जाणार नाहीत,” असे ठाम मत त्यांनी व्यक्त केले. तसेच, शास्त्री यांनी तात्काळ सार्वजनिक माफी मागावी, अन्यथा आंदोलन छेडण्याचा इशाराही देण्यात आला आहे.
वादांची मालिका कायम-
हे पहिलेच प्रकरण नाही. याआधीही नागपुरातील एका कार्यक्रमात धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांनी “चार मुले होऊ द्या आणि त्यापैकी एक देशसेवेसाठी द्या,” असे आवाहन केले होते. त्या विधानावरूनही देशभरात चर्चा आणि टीकेची लाट उसळली होती. नंतर त्यांनी आपल्या वक्तव्याचा हेतू स्पष्ट करत, तरुणांनी सैन्य, वैद्यकीय किंवा इतर क्षेत्रांत जाऊन देशाची सेवा करावी, असा संदेश असल्याचे सांगितले होते.
नागपुरातील या नव्या वादामुळे धार्मिक व्यासपीठावरील वक्तव्यांची मर्यादा, सामाजिक जबाबदारी आणि अभिव्यक्तीची सीमा यावर पुन्हा एकदा गंभीर चर्चा सुरू होण्याची चिन्हे दिसत आहेत.
Advertisement




