‘एका झटक्यात पक्षात फुटला; 7 खासदार बाहेर पडल्यानंतर आपची पहिली प्रतिक्रिया, भाजपवर गंभीर आरोप


नवी दिल्ली : देशाच्या राजकारणात मोठी खळबळ उडवणारी घटना समोर आली असून आम आदमी पार्टीला मोठा धक्का बसला आहे. पक्षातील 7 राज्यसभा खासदारांनी अचानक पक्षाला रामराम ठोकत भाजपमध्ये जाण्याचा निर्णय घेतला आहे. या घडामोडीमुळे आपमध्ये मोठी फूट पडल्याचे चित्र आहे.
या पार्श्वभूमीवर पक्षाचे खासदार संजय सिंह यांनी पत्रकार परिषद घेत आपची भूमिका स्पष्ट केली. त्यांनी या संपूर्ण प्रकरणाला भाजपचे ‘ऑपरेशन लोटस’ असल्याचा आरोप करत, हे घाणेरडे आणि अनैतिक राजकारण असल्याचे म्हटले. “भाजपने आमचे 7 राज्यसभा खासदार फोडले असून पंजाबची जनता हे कधीही विसरणार नाही,” अशी टीका त्यांनी केली.
संजय सिंह यांनी पुढे बोलताना राघव चड्ढा आणि इतर नेत्यांवरही निशाणा साधला. “पक्षाने आणि जनतेने त्यांना मोठे केले, महत्त्वाच्या जबाबदाऱ्या दिल्या. मात्र त्यांनी आता त्याच जनतेचा विश्वासघात केला,” असे ते म्हणाले. त्यांनी संदीप पाठक, अशोक मित्तल, स्वाती मालिवाल यांसह इतर नेत्यांची नावे घेत टीका केली.
दरम्यान, भाजपमध्ये जाण्याची घोषणा करताना राघव चड्ढा यांनी वेगळी भूमिका मांडली. “गेल्या काही काळापासून मी पक्षाच्या कामकाजापासून दूर होतो. पक्षाच्या काही निर्णयांशी सहमत नव्हतो. आमच्यासमोर दोनच पर्याय होते.राजकारण सोडणे किंवा सकारात्मक राजकारणासाठी पुढे जाणे. त्यामुळे आम्ही भाजपमध्ये विलीन होण्याचा निर्णय घेतला,” असे त्यांनी स्पष्ट केले.
या संपूर्ण घडामोडीमुळे राष्ट्रीय राजकारणात नवे समीकरण निर्माण होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
Advertisement




