हिंदुत्वाची भूमिका कायम ठेवा; रामरक्षा आंदोलनावरून उद्धव ठाकरेंवर बावनकुळेंचा हल्लाबोल
Advertisement

नागपूर : अयोध्येतील राम मंदिराशी संबंधित कथित अनियमितता आणि दानपेटी चोरीच्या मुद्द्यावर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाने 5 जुलै रोजी राज्यभर ‘घंटानाद’ आणि ‘रामरक्षा आंदोलन’ करण्याची घोषणा केली आहे. या पार्श्वभूमीवर भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर तीव्र शब्दांत टीका केली.
नागपुरात प्रसारमाध्यमांशी बोलताना बावनकुळे म्हणाले की, उद्धव ठाकरे यांनी आता हिंदुत्वाची भूमिका घेतली असली, तरी ती केवळ राजकीय सोयीसाठी असल्याचे दिसते. “उशिरा का होईना त्यांना हिंदुत्वाची आठवण झाली आहे. त्यांनी ही भूमिका सातत्याने कायम ठेवावी,” असा टोला त्यांनी लगावला.
बावनकुळे यांनी आरोप केला की, महाविकास आघाडीतील सहकाऱ्यांची नाराजी टाळण्यासाठी यापूर्वी उद्धव ठाकरे यांनी प्रभू श्रीराम आणि हिंदुत्वाच्या मुद्द्यांपासून अंतर ठेवले. आता पक्षातील नेते आणि कार्यकर्त्यांची नाराजी वाढत असल्याने त्यांना पुन्हा हिंदुत्वाचा आधार घ्यावा लागत असल्याचा दावा त्यांनी केला.
हनुमान चालीसा प्रकरणाचाही उल्लेख करत बावनकुळे म्हणाले की, त्या वेळी वेगळी भूमिका घेणाऱ्या उद्धव ठाकरे यांना आता रामरक्षा आंदोलनाची आठवण होणे हा राजकीय बदल असल्याची टीका त्यांनी केली.



