येत्या पंधरा दिवसात कारवाई करा अन्यथा…; अमरावती अत्याचार प्रकरणी बच्चू कडू आक्रमक

अमरावती -जिल्ह्यातील परतवाडा-अचलपूर परिसरात मुलींचे लैंगिक शोषण करून त्यांचे व्हिडिओ व्हायरल केल्याच्या संतापजनक प्रकरणावर प्रहार जनशक्ती पक्षाचे नेते बच्चू कडू यांनी तीव्र प्रतिक्रिया दिली आहे. भारतात परतल्यानंतरच या प्रकरणाची माहिती मिळाल्याचे सांगत त्यांनी या घटनेचा निषेध व्यक्त केला.
“अचलपूर-परतवाड्यासारख्या ऐतिहासिक शहराला कलंक लावणारे हे प्रकरण आहे. आरोपीवर कठोरात कठोर कारवाई झाली पाहिजे,” असे स्पष्ट करत बच्चू कडू यांनी संताप व्यक्त केला. गुन्हेगाराला कठोर शिक्षा देण्याची मागणी करत त्यांनी राज्य आणि केंद्र सरकारवरही सवाल उपस्थित केले.
“राज्यात आणि केंद्रात हिंदुत्ववादी सरकार असताना जर मुली सुरक्षित नसतील, तर न्याय कुणाकडे मागायचा?” असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. तसेच “कटेंगे तो बटेंगे” म्हणणारे लोक अशा घटनांवेळी कुठे जातात, असा टोला देखील त्यांनी लगावला.
बच्चू कडू यांनी स्पष्ट केले की, “गुन्हेगाराला जात-धर्म नसतो. गुन्हा करणारा हा गुन्हेगारच असतो.” या प्रकरणात सर्व समाजांनी एकत्र येऊन विरोध करण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले. काही मुस्लिम संघटनांनी या घटनेचा निषेध केल्याबद्दल त्यांनी आभारही मानले.
जात-पात न पाहता मुलींचे शोषण करणाऱ्यांविरोधात सर्वांनी एकत्र येऊन लढा उभारावा,” असे आवाहन करत त्यांनी इशारा दिला की, “१५ दिवसांत ठोस कारवाई झाली नाही, तर आम्ही एसपी कार्यालयावर तीव्र आंदोलन करू.
या प्रकरणामुळे अमरावती जिल्ह्यात संतापाची लाट उसळली असून प्रशासन कोणती ठोस पावले उचलते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
Advertisement



