Nagpur

गडकरींनी स्वत:च्या पक्षातील नगरसेवकाला काढले मुर्खात!


नागपूर : रस्त्यांवर खोदकाम नागपूरकरांसाठी नवे नाही. या खोदकामामुळे अनेक अपघात होतात. त्यामुळे शहराला ग्रहण लावणाऱ्या या खड्ड्याभोवती ‘माझ्या सौजन्याने काम सुरू’ असा फलक लावणाऱ्या एका नगरसेवकाला केंद्रीयमंत्री नितीन गडकरी यांनी मुर्खात काढले. विशेष म्हणजे ते यावेळी ‘हा नगरसेवक माझ्याच पक्षाचा होता’, असे सांगायला गडकरी विसरले नाही.

हॉटेल सेंटर पॉईंटमध्ये इंडियन वॉटर वर्क्स असोसिएशनतर्फे ‘२४ बाय ७ पाणीपुरवठा अभियांत्रिकी’ या पुस्तकाच्या प्रकाशन समारंभात ते बोलत होते. शनिवारी त्यांच्या हस्ते पुस्तकाचे प्रकाशन झाले. यावेळी पुस्तकाचे लेखक डॉ. संजय दहसहस्र, मनीषा पलांडे, कोमलिका गुप्ता उपस्थित होत्या. गडकरी म्हणाले, शहरात रस्ता तयार झाल्यानंतर लगेच तो खोदण्यासाठी दूरसंचार कंपन्या तसेच विविध संस्थाचे कंत्राटदार लगेच पुढे येतात. रस्ता खोदल्यानंतर दोन दोन वर्षे रस्त्यांचे पुनर्भरण केले जात नाही. त्यामुळे खड्डे कायम राहतात. नागपुरातील भगवाननगर भागात एका नगरसेवकाने खड्ड्याभोवती ‘माझ्या सौजन्याने काम सुरू’ असा फलक लावला. दोन वर्षे खड्ड्याभोवती हे फलकही तसेच कायम होते. माझ्याच पक्षाचा तो मुर्ख नगरसेवक होता. त्याला त्याचे नाव खराब होत असून फलक काढायला लावले, असे गडकरी यांनी सांगितले. यावेळी गडकरी यांनी ‘२४ बाय ७’ पाणीपुरवठा प्रकल्प देशात अपयशी ठरला. नागपुरात ही योजना मी आणली. त्यामुळे या प्रकल्पाची माळ माझ्या गळ्यात पडली. नागपुरात काही प्रमाणात हा प्रकल्प यशस्वी ठरल्याचे नमुद करीत त्यांनी काही त्रुटी असल्याचे सांगितले. महापालिका कोणताही प्रकल्प किंवा योजना चांगल्या प्रकारे राबवत नाही. कोणत्या आकाराचे पाईप कुठे उपयोगात आणायचे हेच कळत नाही. यासाठी विस्तृत प्रकल्प अहवाल चांगला असेल तरच यशाची खात्री असते. परंतु, ही योजना यशस्वी होणे आवश्यक आहे. चांगल्या पायाभूत सुविधांत या योजनेचा समावेश होतो. चांगल्या पायाभूत सुविधा असेल तर गुंतवणूक येते, रोजगारनिर्मिती होते. पाणी वितरण क्षेत्रात अनेक सुधारणांची गरज आहे. या पुस्तकात अनुभवाचे लिखाण आहे. त्यामुळे भविष्यात नक्कीच फायदा होईल, असे ते म्हणाले. आता नाग नदी पुनरुज्जीवन प्रकल्पावर काम सुरू असून तांत्रिक व आर्थिक पात्रता तपासून काम केले जात असल्याचे त्यांनी सांगितले.

टक्केवारीमुळेच निकृष्ट दर्जाची कामे

कुठल्याही प्रकल्पात प्रकल्प सल्लागार मोठी समस्या झाली आहे. रस्ते निर्मिती क्षेत्रात तर प्रकल्प सल्लागार सर्वात मोठे गुन्हेगार आहेत. घरी बसून गुगलवरील माहिती घेऊन प्रकल्पाचा आराखडा तयार करतात. याशिवाय अधिकारी, कंत्राटदारातील टक्केवारीमुळे निकृष्ट दर्जाचे काम होत असल्याचे गडकरी म्हणाले. सरकारमधील अनेक अधिकारी काम करीत नाही. उलट कामांमध्ये अडथळे निर्माण करतात. त्यांना कार्यालयात न येण्यासाठी भत्ता देण्याची गरज असल्याचे गडकरी म्हणाले. अनेक धोरण वेळेवर तयार झाले नसल्याचे परिणाम नेत्यांना भोगावे लागतात. शहराचा विकास आराखडा तयार करायला २५ वर्षे लागतात. यातूनच अनधिकृत ले-आऊट तयार झाले. आता ते नियमित करावे लागत आहे. त्यामुळे धोरण वेळेवर तयार होणे महत्त्वाचे असल्याचे त्यांनी सांगितले.

The original article was published on %%sitedesc%%. Read more: %%permalink%%

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error

Enjoy this blog? Please spread the word :)