गडचिरोलीच्या भामरागडमध्ये रानडुकरांचा कहर; रुग्णवाहिका नाही, कावडीच ठरली आधार!

गडचिरोली (प्रतिनिधी) : गडचिरोली जिल्ह्यातील भामरागड तालुक्यात पुन्हा एकदा दुर्गम भागातील कठोर वास्तव समोर आले आहे. दर्भा परिसरात रानडुकरांच्या हल्ल्यांमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, जखमींना उपचारासाठी अजूनही कावडीवरून डोंगर-दऱ्यांतून नेण्याची वेळ ग्रामस्थांवर येत आहे.
३० एप्रिल रोजी सकाळच्या सुमारास मुल्ला चैतु पिडसे (५०) हे जंगलात गेले असताना रानडुकराने अचानक हल्ला केला. या हल्ल्यात त्यांच्या पोटावर गंभीर जखम झाली. दुर्गम परिसरात रस्ता नसल्याने रुग्णवाहिका पोहोचू शकली नाही. त्यामुळे ग्रामस्थांनी बांबूची कावड तयार करून त्यांना सुमारे एक किलोमीटर खडतर मार्गाने मुख्य रस्त्यापर्यंत आणले. त्यानंतर त्यांना भामरागड ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले.
ही घटना घडून अवघ्या २४ तासांतच, १ मे रोजी मादी टुगे पुंगाटी (४५) यांच्यावरही रानडुकराने हल्ला चढवला. या हल्ल्यात त्यांच्या पायाला गंभीर दुखापत झाली आहे. सध्या दोन्ही जखमींवर उपचार सुरू असून त्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती आहे.
तेंदूपत्ता हंगामाच्या पार्श्वभूमीवर जंगलात जाणाऱ्या मजुरांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. वारंवार होणाऱ्या या हल्ल्यांमुळे वनविभागाने तात्काळ गस्त वाढवून नागरिकांच्या सुरक्षेसाठी उपाययोजना कराव्यात, तसेच जखमींना आर्थिक मदत द्यावी, अशी मागणी स्थानिकांकडून होत आहे.
दुर्गम भागात अद्यापही रस्ते व मूलभूत सुविधा नसल्यामुळे आपत्कालीन परिस्थितीत नागरिकांना जीव धोक्यात घालून प्रवास करावा लागत असल्याचे या घटनेतून पुन्हा अधोरेखित झाले आहे.
The original article was published on %%sitedesc%%. Read more: %%permalink%%
