लाडकी बहीण योजनेतील ई-केवायसी दुरुस्तीसाठी मुदतवाढ,आदिती तटकरे यांची माहिती

मुंबई : राज्यातील महिलांसाठी सुरू असलेल्या मुख्यमंत्री ‘माझी लाडकी बहीण’ योजनेबाबत महत्त्वाचा निर्णय जाहीर करण्यात आला आहे. महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी ई-केवायसी दुरुस्तीसाठीची अंतिम तारीख आता ३० एप्रिलपर्यंत वाढवण्यात आल्याची माहिती दिली.
यापूर्वी ही मुदत ३१ मार्चपर्यंत मर्यादित होती. मात्र, अनेक महिलांना अद्याप प्रक्रिया पूर्ण करता आली नसल्याने शासनाने आणखी एक महिन्याची सवलत दिली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या सूचनेनुसार हा निर्णय घेण्यात आल्याचे तटकरे यांनी स्पष्ट केले.
राज्यातील लाभार्थी महिलांना ई-केवायसी अद्ययावत करण्याची ही शेवटची संधी असल्याचेही त्यांनी नमूद केले. जुलै २०२४ पासून सुरू झालेल्या या योजनेअंतर्गत पात्र महिलांना दरमहा १५०० रुपयांची आर्थिक मदत दिली जाते.
अशोक खरात प्रकरणावर प्रतिक्रिया-
भोंदू अशोक खरात प्रकरणावर बोलताना तटकरे म्हणाल्या, या घटनेवरून केली जाणारी टीका दुर्दैवी आहे. घटनेनंतर सर्वप्रथम प्रतिक्रिया देणाऱ्यांमध्ये मीही होते. या प्रकरणात मुख्यमंत्री फडणवीस यांनी एसआयटी स्थापन केली असून तपासाची जबाबदारी अनुभवी महिला अधिकाऱ्यांकडे सोपवण्यात आली आहे.
पीडित महिलांना न्याय मिळणे हीच प्राथमिकता असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. दोषी कोणताही असो, त्याच्यावर कठोर कारवाई झालीच पाहिजे, अशी ठाम भूमिका त्यांनी मांडली.
विलिनीकरणाच्या चर्चांवर स्पष्टीकरण-
विलिनीकरणाच्या मुद्द्यावरही तटकरे यांनी आपली भूमिका स्पष्ट केली. दादांच्या जिवंतपणी आणि त्यांच्या निधनानंतरच्या परिस्थितीत मांडले गेलेले विलिनीकरणाचे मुद्दे वेगळे असल्याचे त्यांनी सांगितले. त्या काळात झालेल्या चर्चांमुळे कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम निर्माण झाला होता.
पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये या विषयावर एकत्रित चर्चा झाली होती, मात्र अजित पवार गटात तशी सुसंगत चर्चा झाली नव्हती, असेही त्यांनी नमूद केले. सुनेत्रा तटकरे यांच्या नेतृत्वाबाबत कोणतीही अधिकृत भूमिका जाहीर झाली नसल्यामुळेच गोंधळ वाढल्याचे त्यांनी सांगितले.
Advertisement




