शिक्षण विभागात बंपर भरतीची घोषणा; शिक्षकेतर १७,५०० पदांसाठी लवकरच भरती प्रक्रिया!

नागपूर : राज्यातील शिक्षण क्षेत्रासाठी मोठी आणि दिलासादायक बातमी समोर आली आहे. महाराष्ट्र शासनाने शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या मोठ्या प्रमाणावर भरतीचा मार्ग मोकळा केला असून, लिपिक, ग्रंथपाल आणि प्रयोगशाळा सहाय्यक अशा विविध पदांसाठी सुमारे १७,५०० जागा भरण्यात येणार आहेत.
गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेली ही भरती आता प्रत्यक्षात येण्याच्या मार्गावर आहे. विशेष म्हणजे २००५ नंतर शिक्षकेतर पदांवर मोठ्या प्रमाणात भरती झाली नव्हती. त्यामुळे शाळांमध्ये प्रशासकीय कामाचा ताण वाढला होता. आता या निर्णयामुळे खासगी अनुदानित माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांना मोठा दिलासा मिळणार आहे.
नव्या आकृतीबंधानुसार विविध पदांची संख्या निश्चित करण्यात आली आहे. यात कनिष्ठ लिपिक पदांची सर्वाधिक संख्या असून, त्याखालोखाल वरिष्ठ व मुख्य लिपिक पदे पदोन्नतीच्या माध्यमातून भरली जाणार आहेत. तसेच ग्रंथपाल आणि प्रयोगशाळा सहाय्यक पदांचीही मोठ्या प्रमाणात भरती केली जाणार आहे.
या भरतीसाठी आवश्यक शैक्षणिक पात्रताही ठरवण्यात आली आहे. कनिष्ठ लिपिक पदासाठी कोणत्याही शाखेतील पदवी आवश्यक राहणार असून, वरिष्ठ व मुख्य लिपिक पदांसाठी किमान तीन वर्षांचा अनुभव आवश्यक असेल. त्यामुळे विद्यमान कर्मचाऱ्यांना पदोन्नतीची संधी उपलब्ध होणार आहे.
शासनाने सुधारित आकृतीबंध लागू करत १०० टक्के नामनिर्देशन पद्धतीने ही भरती करण्याचा निर्णय घेतला आहे. अनुपात तत्त्वानुसार पदांचे वाटप होणार असल्याने भरती प्रक्रियेत पारदर्शकता राखली जाणार असल्याचे सांगितले जात आहे.
या निर्णयाचा सकारात्मक परिणाम शिक्षकांवरही होणार आहे. शिक्षकेतर जबाबदाऱ्या कमी झाल्याने शिक्षकांना अध्यापनावर अधिक लक्ष केंद्रित करता येईल. मात्र, चतुर्थ श्रेणी पदे रद्द झाल्यामुळे शाळांतील सुरक्षेबाबत काही प्रश्न उपस्थित होत आहेत.एकूणच, शिक्षण विभागातील ही बंपर भरती शाळांच्या प्रशासनाला बळ देणारी ठरणार असून, दीर्घकाळापासून रिक्त असलेल्या पदांचा प्रश्न सुटण्याची चिन्हे दिसत आहेत.
Advertisement



