हनुमान जयंतीनिमित्त जामसांवलीत भक्तीचा महासागर; ‘हनुमान लोक’मुळे जागतिक स्तरावर ओळख !

-सतपुडा पर्वतरांगांच्या निसर्गरम्य कुशीत वसलेले पांढुर्णा जिल्ह्यातील सौसर तालुक्यातील जामसांवली धाम आज देशासह विदेशातील भाविकांचे श्रद्धास्थान ठरत आहे. चमत्कारिक श्री हनुमान मंदिर आणि विकसित होत असलेला ‘हनुमान लोक’ प्रकल्प यामुळे हे ठिकाण वेगाने जागतिक दर्जाचे धार्मिक केंद्र म्हणून उदयास येत आहे. रामनवमीपासून सुरू असलेल्या विविध धार्मिक कार्यक्रमांमुळे येथे भक्तीचा उत्सव रंगला असून, दररोज लाखो भाविक दर्शनासाठी गर्दी करत आहेत.
जामसांवली धामाचा इतिहास अत्यंत प्राचीन मानला जातो. येथे भगवान हनुमान पीपळाच्या वृक्षाखाली निद्रामुद्रेत विराजमान आहेत, ही वैशिष्ट्यपूर्ण मूर्ती देशातील अद्वितीय मानली जाते. पूर्वी ही मूर्ती गवतामध्ये दडलेली होती आणि एका शेतकऱ्याला शेत नांगरताना ती सापडल्याची मान्यता आहे. १९९६ साली अल्प साधनसामग्रीत सुरू झालेले हे मंदिर आज भव्य ‘हनुमान लोक’ प्रकल्पाच्या रूपाने विस्तारत आहे.
मध्यप्रदेश शासनाच्या सुमारे ३१४ कोटी रुपयांच्या निधीतून या प्रकल्पाची उभारणी सुरू असून, रामनवमीच्या शुभमुहूर्तावर मुख्यमंत्री डॉ. मोहन यादव यांच्या हस्ते पहिल्या टप्प्याचे लोकार्पण झाले आहे. पुढील टप्प्यांची घोषणाही करण्यात आली असून, प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर उज्जैनच्या महाकाल लोकच्या धर्तीवर हे धाम विकसित होणार आहे.
मंदिर संस्थानचे अध्यक्ष गोपाल शर्मा यांच्या माहितीनुसार, सुमारे ३० एकर क्षेत्रात विकसित होत असलेल्या या कॉरिडॉरमध्ये आधुनिक सुविधा आणि पारंपरिक श्रद्धेचा संगम घडवण्यात आला आहे. गेल्या वर्षभरात ५ कोटी रुपयांहून अधिक खर्चातून ११ एकर जमीन खरेदी, २५ एकरावर बजरंग गोशाळा, भव्य सभामंडप, भक्तनिवास दुरुस्ती, लिफ्ट, प्रशासकीय इमारत, शुद्ध पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, दुकाने पुनर्वसन, पार्किंग, सोलर प्रकल्प अशा विविध विकासकामांची अंमलबजावणी करण्यात आली आहे. सध्या संस्थेकडे ६८ एकरांहून अधिक जागा उपलब्ध असून, त्यामुळे या ठिकाणाचा विस्तार अधिक वेगाने होत आहे.
जामसांवली धाम आता केवळ धार्मिक स्थळ न राहता जागतिक पातळीवर ओळख निर्माण करण्याच्या दिशेने वाटचाल करत आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातूनही या धामाचा प्रचार केला जात आहे. दुसऱ्या टप्प्यात भव्य गर्भगृह, चिरंजीवी पथ, नाल्यांचे सुशोभीकरण, मोठा एसटीपी प्रकल्प, सोलर विस्तार आणि मानसिक पुनर्वसन केंद्र उभारण्याचे नियोजन आहे.
दरम्यान, २६ मार्चपासून सुरू झालेल्या हनुमान जन्मोत्सवात विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. २ एप्रिलपर्यंत पद्मविभूषण स्वामी रामभद्राचार्य महाराज यांच्या वाणीतील श्रीरामकथा सुरू आहे. १ एप्रिल रोजी प्रसिद्ध भजन गायिका स्वस्ति मेहूल यांची भजन संध्या होणार असून, २ एप्रिलच्या मध्यरात्री वाराणसी येथील पुरोहितांकडून अभिषेक आणि पहाटे ४ वाजता महाआरती पार पडणार आहे.
जामसांवली धाम आज श्रद्धा, विश्वास आणि आधुनिकतेचा संगम ठरत असून, भविष्यात देशातील प्रमुख धार्मिक स्थळांमध्ये आपली वेगळी ओळख निर्माण करेल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.
The original article was published on %%sitedesc%%. Read more: %%permalink%%
