शेतकऱ्यांना दिलासा! जमीन मोजणी आता फक्त १ हजारात; बावनकुळे यांची मोठी घोषणा

नागपूर : राज्यातील शेतकऱ्यांसाठी मोठा दिलासादायक निर्णय जाहीर करत महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी जमीन मोजणी प्रक्रिया अत्यंत स्वस्त आणि जलद करण्याची घोषणा केली आहे. पूर्वी जमीन मोजणीसाठी शेतकऱ्यांना १० ते १२ हजार रुपयांचा खर्च करावा लागत होता, मात्र आता हीच प्रक्रिया केवळ १ हजार रुपयांत पूर्ण होणार आहे.
नागपूर विमानतळावर प्रसारमाध्यमांशी बोलताना बावनकुळे यांनी सांगितले की, भोगवटा महसूल निर्णयामुळे मोजणी प्रक्रिया सुलभ करण्यात आली आहे. यासाठी खाजगी भूमापकांना परवानगी देण्यात येणार असून त्यांची नियुक्ती जिल्हाधिकाऱ्यांमार्फत केली जाईल. या भूमापकांच्या कामावर सरकारी यंत्रणा नियंत्रण ठेवणार असून प्रमाणितीकरणही करण्यात येणार आहे.
सध्या जमीन मोजणीसाठी साधारणतः ६० दिवसांचा कालावधी लागतो. मात्र नवीन निर्णयामुळे पुढील दीड वर्षात ही प्रक्रिया केवळ १५ दिवसांत पूर्ण करण्याचा सरकारचा मानस असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. मोजणीनंतर खरेदीखत आणि नोंद बदल (म्युटेशन) प्रक्रिया वेळेत पूर्ण केल्यास भविष्यातील जमीन वाद टाळता येतील, असेही त्यांनी नमूद केले.
दरम्यान, यवतमाळ जिल्ह्यातील वनहक्क दाव्यांबाबत बोलताना त्यांनी सांगितले की, ग्रामस्तरीय समित्यांनी मंजूर केलेल्या अर्जांचा फेरआढावा घेतला जाणार आहे. आदिवासी शेतकऱ्यांचे हक्क अबाधित राहतील आणि त्यांना कोणताही अन्याय होणार नाही, याची सरकारकडून काळजी घेतली जाईल.
नागपूर शहरातील पाणीपुरवठ्याच्या समस्येवरही त्यांनी गंभीर चिंता व्यक्त केली. शहरात सुमारे ४० टक्के पाणी गळती होत असल्याचे त्यांनी सांगितले. काही ठिकाणी अवैध पंप आणि व्यावसायिकांकडून जास्त प्रमाणात पाणी उचलले जात असल्याचेही त्यांनी निदर्शनास आणले.
या प्रकरणांवर कारवाईसाठी नोटिसा देण्यात आल्या असून, गरीब आणि मध्यमवर्गीय नागरिकांवर अन्याय होणार नाही याची खबरदारी घेतली जाईल. विशेषतः सीताबर्डी आणि महाल परिसरात मंजूर क्षमतेपेक्षा अधिक पाणीउचल होत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
The original article was published on %%sitedesc%%. Read more: %%permalink%%
