कामठीत रेत घाटावरून वाद; शेतकऱ्यावर हल्ला, कुंभापुरात तणावपूर्ण वातावरण

नागपूर : कामठी तालुक्यातील कुंभापुर येथे रेत घाटाच्या वादातून शेतकऱ्यावर मारहाण झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. मौदा पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडलेल्या या प्रकारामुळे परिसरात संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे.
लिहीगाव येथील विनोद कृष्णराव ढेंगरे (वय ३९) हे आपल्या शेतातील गव्हाची कापणी करण्यासाठी हार्वेस्टर घेऊन कुंभापुर येथील शेतात जात होते. मात्र शेताकडे जाणाऱ्या अरुंद रस्त्यावर रेत वाहतूक करणारे ट्रॅक्टर उभे असल्याने त्यांचा मार्ग अडवला गेला. त्यांनी संबंधित चालक आणि घाटावरील कामगारांना ट्रॅक्टर बाजूला घेण्याची विनंती केली.
यावरून काही कामगारांनी वाद घालत त्यांच्याशी हुज्जत घातली आणि परिस्थिती चिघळत गेली. वादाचे रूपांतर हाणामारीत होऊन विनोद ढेंगरे यांना मारहाण करण्यात आली. या घटनेत ते जखमी झाले असून त्यांच्यावर मौदा येथील रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
या प्रकरणी मौदा पोलिसांनी तक्रार नोंदवून तपास सुरू केला आहे. दरम्यान, या भागात रेताचे अवैध उत्खनन सुरू असल्याचा आरोप स्थानिक शेतकरी आणि नागरिकांनी केला आहे. दिवसा केवळ औपचारिक काम सुरू असल्याचे दाखवले जाते, तर रात्री जेसीबी आणि पोकलेनच्या साहाय्याने मोठ्या प्रमाणात रेत काढली जाते, असा आरोप आहे.
कन्हान नदीवरील कुंभापुर रेत घाटाचा काही दिवसांपूर्वीच लिलाव झाला असून, घाटधारकाने मोठ्या प्रमाणात रेत उत्खनन सुरू केले आहे. यासाठी भाड्याने ट्रॅक्टर घेतले असून काही कामगारांकडून दादागिरी होत असल्याचेही स्थानिकांनी सांगितले आहे. या घटनेनंतर शेतकरी आणि नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे.
The original article was published on %%sitedesc%%. Read more: %%permalink%%
