अवकाळी पावसाचा फटका; तातडीने पंचनाम्याचे आदेश; महसूल मंत्री बावनकुळे यांचा आदेश

नागपूर : राज्यात बुधवारी रात्री झालेल्या अवकाळी पावसामुळे अनेक भागांतील पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. या पार्श्वभूमीवर महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी तातडीने पंचनामे करण्याचे आदेश देण्यात आल्याची माहिती दिली. पंचनाम्यांचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर शेतकऱ्यांना नुकसानभरपाई देण्याबाबत अंतिम निर्णय घेतला जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले.
उत्तर महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भातील विविध जिल्ह्यांत पावसामुळे शेतीचे नुकसान झाल्याचे प्राथमिक चित्र समोर आले आहे. त्यामुळे प्रशासनाला तत्काळ सर्वेक्षण पूर्ण करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. मुख्यमंत्री यांनीही याबाबत त्वरीत कारवाई करण्याचे निर्देश दिले असल्याचे बावनकुळे यांनी सांगितले.
दरम्यान, भोंदू बाबा अशोक खरात प्रकरणावर बोलताना बावनकुळे यांनी विरोधकांना आवाहन केले की, केवळ आरोप-प्रत्यारोप न करता त्यांच्या कडे असलेले पुरावे एसआयटीकडे सादर करावेत. या प्रकरणातील विविध आरोपांची चौकशी विशेष तपास पथकाकडून सुरू असल्याचे त्यांनी नमूद केले.
याशिवाय, राज्यातील शहरी व ग्रामीण भागातील १ जानेवारी २०११ पूर्वी सरकारी जमिनीवर किंवा लेआउटमध्ये बांधण्यात आलेल्या घरांना नियमित करण्याचा निर्णयही जाहीर करण्यात आला आहे. याआधी ५०० चौरस फुटांपर्यंत मर्यादा होती, ती वाढवून आता १,५०० चौरस फूट करण्यात आली आहे. संबंधित व्यक्ती महाराष्ट्रातील रहिवासी असणे आणि त्याचे नाव २०११ च्या मतदार यादीत असणे आवश्यक असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. तसेच, यानंतर अनधिकृत बांधकामांवर कठोर कारवाई केली जाणार असल्याचा इशाराही देण्यात आला आहे.
The original article was published on %%sitedesc%%. Read more: %%permalink%%
